Monday, 28 January 2019

भटकंती

आभाळमाथ्यावर लालबूद डोळ्याच्या गिधाडानं मेलेल्या जनावरावर नजर रोखावी , तसा काळ्या काळ्या ढगांच्या मागे लपून पाऊस या दारातून त्या दारात पसाभर पिठ , मिठाचे चार खडे आन चार दोन मिरच्या उसनवार मिळतील म्हणून माय सारखी पायपीट करत होती पाऊस उघडल्या पासून. चार दिवसापासून आज पावसानं थोडी उघाड दिली होती.
            पन्नासेक घराची वस्ती असलेलं गाव आधूनिकतेच्या सर्वच सुखसोईपासून काही युगे दूर होतं.  गावाला रस्ता नाही़ . गावात शाळा नाही. दवाखाना तर नाहीच नाही. माय एकूण एकोनपन्नास उंबर्यावर  पदर पसरून आली. पण एकानही मायच्या पदरात भीक घातली नाही. घरी आम्ही मायची वाट पहात होतो, आणि आल्यावर आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून तोंडात येणारी लाळ गिळत होतो. मी सर्वात मोठा असल्यामुळे मी जरा जास्त खाईल म्हणून सर्वांना दम देत होतो. दोन भाऊ चार बहिणी आई आणी बाप मिळून एकून आठ जणाचं कुटूंब.
              चार दिवस सततधार पाऊस झाल्यामुळे गावाच्या बाहेर जाणे कोणालाच जमत नव्हते .गावापासून चार कोसावर दुसरं गाव तिथच काय ते एक वान्याचं दुकान आणि त्याचीच चक्की होती़ आठ मैल रोज गवताचा भारा डोक्यावर नेऊन विकायचा आणि आलेल्या पैशात किलोक भर पिठ थोडं तेल मिठ मिरच्या आणून  घर चालवायचं. आम्ही होतो तसेच गावातील सगळी कुटूंब असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गवत आणि उन्हाळ्यात मोळ्या लाकडं विकून आपला उदर निर्वाह चालवायचे. काहींच्या घरात जास्त माणसं असल्यामुळे कमाई जादा यायची. त्यांच्या घरात असेलही धान्य पण उसनवार कसी करणार. आणि हिनं नाहीच दिलं परत तर काय करायचं म्हणून मायला कोणीच उभं करत नव्हते. माय घरी आली आणि मागच्या भिंतीला पाठ लावून मटकन खाली बसली. आम्ही सहाही भावंड मायच्या जवळ प्रशनार्थक नजरेनं मायला पाहू लागलो. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मग मी च मायला विचारलं  "भाकर नाय आनली  "? तसी मायनं शब्दही न काढता नकारार्थी मान हलवली.मी क्षणाचाही विलंब न करता भोकांड पसरलं. " मले भाकर पायजे." मायनं समजावण्याचा प्रयत्न केला." आता संद्याकायी तुवा बाप यीन. मंग तुयासाटी सेवपापळी आणिन. फुटाने आणिन. उस आणिन. मंग माया राजा गुटूगुटू खाईन." मी आणखी जोरात रडायला लागलो. "मले ऊस नायी पायजे भाकर देभूक लागली."
माय एकदम चिडली.
"भुक लागली तं खाय मले. नायीतरी काय रायलं जिवनात "...माय
"मले भाकर दे. मले भुक लागली.".....मी.
मायनं हात धरून जवळ ओढलं, आणि हातात लागील त्या वस्तूनं मारायला सुरूवात केली. मी आणखी जिव तोडू रडायला लागलो. बाकीची भावंड मायचा अवतार पाहून कोपर्यात दडून बसली. कोणाचाही आवाज नाही. मी मात्र बेंबीच्या देठापासून ओरडत होतो.कितीवेळ मायनं मारलं माहीत नाही. नंतर छातीसी धरून तीही हंबरून रडायला लागली. कोपर्यातली भावंड मायला रडतांना पाहून तिच्याजवळ येवून तिच्याही पेक्षा जोरात रडायला लागली. मी मात्र आता एकदम शांत झालो. मला काहीच कळत नव्हतं काय झालं. मारलं आपल्याला आणि रडते माय. मी स्वासावर नियंत्रण करत मायचे डोळे पुसायला लागलो. मायनं आणखी घट्ट मिठी मारली. त्यातच झोप कधी लागली कळलं नाही.
            संध्याकाळी बाप आला बापानं पिठ आणलं .मायनं स्वयंपाक केला. मिरच्या भाजल्या त्याचा ठचका बसला.पण वासानं आणखी भूक पेटली. मायनं एक भाकर अन् दोन मिरच्या ठेवलेलं ताट माझ्यापुढे सरकवलं. काहीही शब्द न बोलता मी भाकरीवर तुटून पडलो. मिरची लागली तोंडाची आग झाली. तसी माय म्हणाली......
" वधर पाय ते पाय काय आये "
जेवन झाल्याबरोबर मी झोपलो. भावंडही झोपली असतील. दुसर्या दिवशी आम्ही गावातून निघालो. माझ्या हातात एक पिशवी होती. त्यात काही घरात वापरावयाचे भांडे होते. मायच्या डोक्यावर एक गाठोडं होतं बापाच्याही डोक्यावर तसच काहीतरी होतं.गाव मायला आणि बापाला जावू नका म्हणून बोलत होते. मला किवा भावडांना काही कळत नव्हतं पण मी खुष होतो आपण गावाला जातोय म्हणून.
              पुढे आम्ही चालतच रात्र झाली की तिथच मुक्काम करत कोणत्यातरी मोठ्या गावात आलो. तिथ गावातल्या सारखी कौलाची घरं नव्हती .मकानच्या मकानच दिसत होती. फक्त आमच्यासाठी घर नव्हतं. चार बहीणींपैकी दोन मेल्या .मग एक भाऊ मेला. बापाला एक दिवस पोलीसानी पकडून नेलं . त्यादिवसी आम्ही खुप रडलो. माय पण रडत होती. त्या धक्यानं माय आजारी पडली. आपण परत गावाकडे जावू म्हणत होती. मी जायला तयार नव्हतो. कारण ईथं आल्यापासून एक दिवसही उपवास घडला नव्हता. रोज कही ना काही खायला मिळत होतं.
एक दिवस माय नं जिव सोडला. आम्ही अनाथ झालो. मायला
गाडीत टाकून नेलं. त्या दिवसा पासून आम्ही बापाचा शोध घेत त्याच गावात फिरतो आहोत.
कोणीच पत्ता सांगत नाहीत. आमची भटकंती थांबत नाही.
.

Wednesday, 16 May 2018

किसी रोज उनसे मुलाकात होगी...

आयुष्य.. खरं तर या आयुष्यात आपण असंख्य लोकांना भेटत असतो, पण काही व्यक्ती इतक्या विशेष असतात की ज्या आपल्या आयुष्यात येऊन एक अविस्मरणीय आठवण बनून जातात आणि आपण अपेक्षेत असतो की कधीतरी तो व्यक्ती येईल आणि पुन्हा कधीतरी तेच क्षण जगायला मिळतील, आणि त्यातल्या त्यात एखादी व्यक्ती जीच्यासोबत कुछ कुछ love जैसी feeling येते ना तिच्या बद्दल काय सांगावे..असच काहीसं आयुष्यात सुरु असताना त्याच्या आयुष्यात "ती" येते..तो असतोच मुळात थोडा शांत थोडा रागीट पण प्रेमळ, लवकरच कोणालाही जीव लावणारा..आणि ती अतिशय मनमिळाऊ बोलकी कोणालाही आपलंसं करणारी..
त्याची आणि तिची ओळख होते ती त्याचा कामाचा भाग म्हणून..सुरवातीला तो तिच्याशी फक्त कामापूरतच बोलतो पण दिवस जातात तसा तिचा मनमिळाऊ स्वभाव त्याला आवडू लागतो मग एकदा कामाच्या बाबतीत बोलत असताना ती त्याला सांगते तिच्या मनात सुरु असणारी घालमेल ज्यात तो तिला मदत करतो आणि मग सुरु होते त्यांची मैत्री..तिचेही त्याला वारंवार कॉल यायला लागतात आणि हा हि तिच्या सोबत वेळ घालवता यावा म्हणून या ना त्या कारणाने तिच्याशी बोलणारा असच करता करता ते बाहेर कामाव्यतिरिक्त भेटू लागतात तेच काही क्षण याच आयुष्य होऊन बसतात आणि तिची त्याला सोडून जायची वेळ येते मनात खूप इच्छा असते की बोलावं सांगावं आपल्या मनातल्या भावना..पण दुसऱ्याच क्षणी वाटत कि राहू देत..तिलाही समजत असेल कदाचित पण ती ही जाते आणि हा पुन्हा आपल्या आठवणीत रमून म्हणतो किसी रोज उनसे मुलाकात होगी..☺️

Tuesday, 20 March 2018

Facebook Notification...

तो आपल्याच विश्वात जगणारा....स्वतःच्या स्वप्नपूर्ती साठी झटणारा...अशावेळी ती त्याच्या आयुष्यात कामानिमित्त येते आणि त्याच आयुष्य होऊन जाते..पण जशी एक वाऱ्याची झुळूक येऊन मनाला आनंद देऊन जाते तशी ती , त्याच्या आयुष्यात येऊन एखाद्या कथेतल्या पात्रासारखी निघूनही जाते...परंतु त्याच्या आयुष्यातील तीची आठवण मात्र कायम राहते..हा सुद्धा त्याच क्षणांसोबत आयुष्य जगत असतो...सतत ती त्याची imagination व त्याच्या मानसिकतेतून उत्पन्न होणाऱ्या असंख्य कथा..ज्या त्याच्या आणि तिच्या सुंदर आयुष्याची कथा रंगवत असतात आणि हा...me and my imagination यातच खुश असताना... ती एक facebook ची notificationत्याचं आयुष्य सुखमय करून जाते..ज्यात तिने त्याची friend request accept केलेली असते..आणि पुन्हा सुरु होतो एक नवीन प्रवास त्याच्या व तिच्या कथेचा...

Wednesday, 5 April 2017

नर्तकी.....

.....गावाच्या पूर्वेला घनगर्द गगनचुंबी वृक्षांच्या आडोशाला काहीसा लाजरा बुजरा तिचा रंगमहाल, सूर्य मावळतीला आला की तिच्या रंगमहालतील दिवे रंगमहालचा एकेक कोपरा उजळून काढण्यासाठी जणू आपापसात पैज लावतात. दिव्यांच्या त्या लखलखत्या प्रकाशात तिचा चेहरा पहिला की, दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर आहे की, तिच्या चेहर्‍याचा प्रकाश दिव्यांनी स्वीकारला काहीच काळेनास होतं.
रात्र चढायला लागली की, पश्चिमेकडे विसवलेलं  गाव , अंधाराची चादर अंगावर पांघरुन निद्रेच्या आडोलशाला जातं, तेव्हाच तिच्या रंगमहालातल्या वाद्यांवर ताल सुर पकडण्यासाठी पैज लागलेली असते. तिच्या पायातील नुपुरांचा कर्णमधूर आवाज दाहिदिशेला घुमताना वातावरणात जणू मदिरेची धुंदी पसरवीत जातो. तबल्यावर खान साहेबांचा हात क्षणातच ढगांचा गडगडाट तर क्षणातच चांदण्यांची बरसात करून जातो. सातरीच्या मधुरमय नादात रंगमहालात हजर असलेल्या तरुण काळजांवर केव्हा गारुड झालं कुणाच्याही लक्षात येत नाही.  सगळे कसे भारावलेले मदिरेचा थेंबही न चाखता धुंधीच्या अधीन झालेले तिच्या नितळ गळ्यातून निघलेली एखादी तान आणि रंगमहालात चालताना तिच्या पदन्यासाची जादू हळूहळू वातावरणात भरत  जाते.
पेटत्या दिव्यांचा वाती आता तारुण्यात आलेल्या..........
क्रमशः 

भटकंती

आभाळमाथ्यावर लालबूद डोळ्याच्या गिधाडानं मेलेल्या जनावरावर नजर रोखावी , तसा काळ्या काळ्या ढगांच्या मागे लपून पाऊस या दारातून त्या दारात पसाभर...